शुक्रवार, १५ जुलै, २०१६

आषाढी एकादशी रथोत्सव आणि चातुर्मास्ये महाराज परंपरा*"

*"आषाढी एकादशी रथोत्सव आणि चातुर्मास्ये महाराज परंपरा*"

निज जना अमृतें बहु तर्पिती स्व अनवे अनवे कर अर्पिती ||
सतत पुर्ण मुकुंद यशोंरसें न वदना वदना म्हणती असे||१||

(आर्याकार कवीवर्य मोरोपंत)

    कवीवर्य मोरोपंत आर्याकार यांच्या या वरील आर्येतुन दादा महाराज 'अन्वेकर' उपनांवाने "अनवे" नगरीत प्रगटले आहेत. अशा प्रकारचा आशय लक्षात येतो.
सतराव्या शतकातील पुर्वार्धाच्या शेवटी च्या काळात दादा महाराजांचा जन्म अनवे नगरीत "गोपिनाथ पंडीत गोसावी" यांच्या आचारसंपन्न कुळात झाला.
"त्या अनव्या
माझारी |
भरद्वाज गोत्राभीतरी |
गोपजींच्या वंशांतरी |
जन्मले दादामहाराज ||"
(दासगणू महाराज विरचित दादा म.च.अ.१ ओवी२०)

सदगुरु दादा महाराजांचा जन्म  भगवंताची उपासना  ज्या घरात अविरत आहे.त्या घरात झाला होता. त्यामुळे महाराज पारमार्थिक कार्यापासुन कसे दुर राहतील?
याचीच प्रचिती महाराजांच्या बाबतीत ही आली.प्राथमिक अध्ययन झाल्यावर सदगुरु दादा महाराजांनी पंढरीची वारी सुरु केली. एकुण १२ वर्षे पंढरीची आनवा-पंढरपूर वारी झाल्यावर एका वारीला पंढरीत महाराज असतांना साक्षात विटेवरच्या भगवंतानेच महाराजांना दृष्टांत दिला आणि आज्ञा दिली की,"संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचे अवतार कार्य तुम्हाला पुर्ण करायचंय."आता वारी एकच करायची..."आषाढी ते कार्तिकी पंढरीत राहायचं आणि कीर्तनसेवा करायची."!!
यांच वर्णन दासगणु महाराज करतात-
"तु सांप्रत या भूवरी | तू पुर्वजन्म माझारी भानूदास होतास ||
आता हीच विनंती | आहे बापा तुजप्रती | चातुर्मास पंढरीप्रती | राहून कीर्तन करावे ||"
त्याचबरोबर सदगुरु दादा महाराज त्यांच्या स्वकृत अभंगात म्हणतात-
"जन्मभूमीस्थाना आज्ञा दिली हरी |
चातुर्मास वारी निरोपिली ||
कवीवर्य मोरोपंत आर्याकार म्हणतात-
"श्रीविठ्ठल निज जन सद्गुण कीर्तन सुखार्थ अवतरला |||

अशाप्रकारे चातुर्मासाची कीर्तनसेवा सुरु झाली.सर्वप्रथम ही सेवा काही वर्षे भगवंताच्या राउळात चालली.पण नंतर काही लोकांनी महाराजांना उपद्रव करण्यास सुरुवात केली.तेव्हापासुन चातुर्मासाची कीर्तनसेवा पंढरीच्या वाळवंटात पुंडलिकाच्या जवळ चालु झाली.पण वाळवंटात ऊन,वारा,पाऊस यांसारख्या नैसर्गीक आपत्तींमुळे वारकरी मंडळींना त्रास होत.तरीही कीर्तनसेवा मात्र अविरत चालु होती.
एकेदिवशी अचानकच पंढरीतील पेशव्यांचे सावकार" शिवरामपंत खाजगीवाले" यांच्या स्वप्नात भगवान पांडुरंगाने त्यांना आज्ञा दिली की "दादा महाराज अनवेकर यांच्याकडे जा आणि त्यांचा अनुग्रह घ्या,व त्यांना कीर्तनासाठी जागा उपलब्ध करुन दया"
शिवरामपंताना त्यावेळी महाराजांचा अनुग्रह मिळाला.पंतांनी त्या दिवशीची वास्तु बांधण्यासाठी सुरुवात केली.ही वास्तु पुर्ण झाल्यावर तिथे "विठ्ठल रुख्मणीच्या" मुर्तीची स्थापना केली.त्यावेळी श्री खाजगीवाले व दादा महाराजांच्या लक्षात आले की गर्दी मुळे बहुतांश वारकऱ्यांचे पांडुरंगाचे दर्शन होत नाही. म्हणुन त्यावर्षी पासुनच *सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये व शिवरामपंत खाजगीवाले याच्या पुढाकारातुन आषाढीचा रथोत्सव चालु करण्यात आला*.रथासोबत त्याकाळी सदगुरु दादा महाराजांची दिंडी असायची.हा सोहळा नयनरम्य व्हायचा.
याचे वर्णन चरित्रकार श्री विष्णुपंत तोंडापुरकर करतात-
*"मंडप उभावोनी अति त्वरे | विनवोनी भक्ता सुविचारे | स्थापुनी मूर्ती अति सुंदरे | सन्मुख सादर कीर्तनारंभ*
||(सदगुरु दादा म.ओवीबध्द चरित्र.अ.७,ओवी१०६)

*रथ करोनी निर्माण | संतसभे भक्तजन | आनंदे कथा कीर्तन |मुर्ती स्थापन रथामाजी ||*
(सदगुरु दादा म.ओवीबध्द चरित्र अ.७ओवी १०७)
अशा प्रकारे इथुन पुढील चातुर्मासाची कीर्तन सेवा "खाजगीवाल्यांनी बांधलेल्या वाड्यात(म्हणजे सध्या माहेश्वरी धर्मशाळा जिथे अस्तित्वात आहे त्याठिकाणी!) होण्यास सुरुवात झाली.
ही रथाच्या दिंडीची परंपरा चातुर्मास्ये परंपरेतील ८ वे सत्पुरुष ह.भ.प.वै.सदगुरू बाळकृष्ण महाराज चातुर्मास्ये यांच्यापर्यंत चालु होती.पण काही वादामुळे ती बंद पडली.
पण तरीही आजच्या काळातसुद्धा *आषाढी एकादशी ला म्हणजे आजच्या दिवशी "चातुर्मास्ये महाराजांची दिंडी" पुर्वी रथ ज्या वेळेला निघायचा त्या वेळेवरच म्हणजे दुपारी १२ वाजताच मठातुन निघते*बाकी नियमाच्या दिंड्या सकाळीच निघतात.आणि दुपारी १२ वाजेपर्यंत जागेवर पोहचतात.
दिंडी प्रदक्षिणेहून मठात आल्यावर ,संध्याकाळी नियमाप्रमाणे आजच्या दिवशी गादीवरील सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये यांचे *विद्यमान वंशज ह.भ.प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांची कीर्तनाची सेवा होते.*
तर आषाढ वद्य पंचमी पासुन चातुर्मासाच्या कीर्तनसेवेला सुरुवात होते.

*पुज्य दादा महाराजांनी सुरु केलेल्या चातुर्मासाच्या कीर्तन सेवेच यंदाच २६१ वर्ष आहे.*!!

संदर्भ ग्रंथ-
१)संतकवी
दासगणू महाराज लिखीत सदगुरु दादा महाराजांचे चरित्र.
२)कवीवर्य मोरोपंत आर्याकार विरचित सदगुरु दादा महाराज यांचे स्तुती काव्य.
३) साम्प्रदाय दर्शन
लेखक- मिलींद दंडवते,आळंदी.
४)श्री विष्णूपंत तोंडापूरकर लिखीत,सदगुरु दादा महाराजांचे ओवीबध्द चरित्र
५)गुरुलिलामृत.
लेखक- विष्णूपंत तोंडापूरकर
६) मोरोपंतांचे मित्रमंडळ...

अशा प्रकारेच "संत साहित्य अभ्यास मंडळाच्या" सदस्यांचे सर्व लेखन नेहमी वाचण्यासाठी आता खालील Link ला भेट द्या-

abhyasmandal.blogspot.com

© श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.

गुरुवार, १४ जुलै, २०१६

ज्ञानमहर्षीचा सद्गुरु वासुदेव महाराजांचा वैकुंठगमनसोहळा - आषाढ शु. दशमी २०१६ श्रीक्षेत्र पंढरपूर

हे संतजीवन एकदा नक्की वाचा....
ज्ञानमहर्षीचा वैकुंठगमनसोहळा - आषाढी दशमी २०१६ श्रीक्षेत्र पंढरपूर….
तुम्ही संत मायबाप कृपावंत | काय मी पतित कीर्ती वाणू ||
अवतार तुम्हा धराया कारण | उद्धराया जन जड जीव ||
वाढावया सुख भक्ती भाव धर्म | कुळाचार नाम विठोबाचे ||
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी | तैसे तुम्ही जगी संतजन ||
महाराष्ट्र या परम पावन भूमीत वारकरी सांप्रदायात अनेक थोर संत विभूती अवताराला आलेत आणि जड जीवाचा उद्धार करून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.अश्याच या विदर्भाच्या पवित्र कुशीत फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८३९ शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी १९१७ ला सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र अकोली जहागीर ता.अकोट.जिल्हा अकोला येथे एक तेजपुंज महान ज्ञानयोगी अवताराला आलेत ते म्हणजे गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज.गुरुवर्य महाराजांनी वयाच्या पाचव्या वर्षी काळगव्हाण येथे रामनवमीच रामजन्माच कीर्तन "संतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळोनी जाय ||"या अभंगावर केल आणि ब्रम्ह्स्वरुपाच दर्शन सर्वांच्या हृदयात झाल.बाविसाव्या वर्षी ईश्वरप्राप्तीसाठी सातपुड्यात गेले.गजानन महाराजांनी त्यांना साक्षात्कार देवून सांगितले कि पंढरपूरला जा तेव्हा महाराज विठ्ठला जवळ आले.आशीर्वाद घेतला आणि पंढरपुरात विचारणा केली कि मला योग्य मार्ग कोण दाखवेल ? तेव्हा त्यांना गुरुवर्य बंकटस्वामी महाराजांचं नाव सांगण्यात आल.बंकटस्वामी महाराजांनी त्यांना सांगितल कि आळंदीत जोग महाराज संस्थेत जा.तिथून महाराज आळंदीत आले ते वर्ष होते १९३९ आणि संस्थेच्या नियमाप्रमाणे १०८ ज्ञानेश्वरीचे पारायण केलेत आणि संस्थेत बसले.४ वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण करून संपूर्ण गुरुजनांच्या हृदयात प्रेमाच स्थान मिळवलं.पुढे पुन्हा पंढरपूरला गेलेत आणि भगवान शास्त्री धारूरकर यांच्याकडे ब्रम्ह्सुत्र आणि गीताभाष्य ऐकले.तेव्हा त्यांच्याबरोबर गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आणि गुरुवर्य मामासाहेब सोबत होते.पुढे बनारसला वेद आणि उपनिषद यांचा अभ्यास केला.कीर्तन प्रवचनाला सुरुवात झाली.सद्गुरु जोग महाराजांची परंपरा अंगात पूर्णपणे मुरल्यामुळे"जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे ||"या अभंगाला अनुसरून एक पै न घेता धर्मजागृती केली.पुढे नागझरी येथे वारकरी शिक्षण संस्थेच प्राचार्य पद स्वीकारलं.गौरीशंकर महाराज यांची शेगावला भेट झाली आणि त्यांनी सद्गुरु गजानन महाराजांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य आणि वासुदेव महाराजांचे आजोबा श्रीसंत भास्कर महाराज यांच्या अडगाव येथील संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करायची आज्ञा दिली.संपूर्ण आमजनतेच्या सहकार्यातून १९५५ साली ४०००० वारकरी आणि ११०० संतांच्या उपस्थित गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच "हेचि दान दे गा देवा" या अभंगावर कीर्तन झाल आणि समाधीचा जीर्णोद्धार केला.त्या कार्यक्रमाला गौरीशंकर महाराज,बंकटस्वामी महाराजांचे पुतणे भीमसिंग महाराज राजपूत,आळंदीचे भाऊसाहेब वरोलिकर,गोपाळबुवा नागरगोजे,नाना महाराज कोठेकर,प्रल्हादबुवा इलोरेकर,पांडुरंगबुवा पाटकर हे संत उपस्थित होते.पुढे श्रीसंत गजानन महाराजांनी सजल केलेली अकोली जहागीर शेत सर्वे नंबर ५२ मधील विहीर हिचा जीर्णोद्धार २१/११/१९६३ ला केला.संतचरीत्राबाबत लोकांच्या असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि वारकरी संत विचारांचं कार्य काय आहे यासाठी गुरुवर्य महाराजांनी ३७ ग्रथांच स्वज्ञानांतून लिखाण केल.त्या संत चरित्राची दखल परदेशात सुद्धा घेतल्या गेली आणि तिथेही ते ग्रंथ प्रकाशित झाले.पुढे ८/७/१९९८ ला आळंदी येथील सिद्धबेटातील मंदिरे काही समाज कंटकांनी जमीनदोस्त केली.त्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करून सुप्रीम कोर्टात लढा कायद्याच्या चौकटीतून दिला आणि सिद्धबेट मुक्त करून दिल.गुरुवर्यांनी कुठलीच अपेक्षा न ठेवता सन २००२ मध्ये आपली संपूर्ण मालकी हक्काची जागा,जमीन,द्रव्य हे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगाव यांना दान दिले.संपूर्ण महाराजांच्या इच्छेप्रमाणे कार्य झाल आणि आता वेध लागले होते ते वैकुंठाला जाण्याचे.सन २००९ मध्ये गुरुवर्य महाराज खूप आजारी पडले.सर्वांच्या लक्षात येऊ लागल कि गुरुवर्य आपल्या दृष्टीआड होणार.महाराजांनी आवराआवर सुरु केली.आपल्या जवळच्या मंडळींना बोलावून घेतले.श्री माधवराव मोहोकार,सौ.गीताआक्का,ची.पुरुषोत्तम,ची.उमेश आणि अकोल्याचे गुरुवर्यांचे परमभक्त श्री वासुदेवराव महल्ले साहेब आणि त्यांना सांगितले कि आता आम्हाला निरोप द्या.सर्वजण रडायला लागले.गीता आक्काने महाराजांचे नातू श्री ज्ञानेशप्रसाद पाटील यांना बोलावून घेतले आणि सांगितले कि आपला आधार निघून जातोय.तेव्हा महाराज सर्वांना म्हटले"मी तर चांगदेवासारखा १४०० वर्ष जगू शकतो परंतु ती काळाची विटंबना होईल.मी जरी शरीराने गेलो तरी आत्मरूपाने कायम इथेच आहे.तुम्ही मी सांगितलेला भक्तिमार्ग सोडू नका.देहू,आळंदी,पंढरपूर,हि वारी,गळ्यात पवित्र तुळशीची माळ,एकादशी व्रत व गाथा ज्ञानेश्वरीच वाचन कधी सोडू नका."आषाढ शुद्ध चतुर्थीला शुक्रवार दिनांक २६/६/२००९ ला नेहमीप्रमाणे गुरुवर्य महाराज शेगाव वरून पंढरपूर नेण्यासाठी आलेल्या गाडीत बसले.शनिवारी सकाळी २७/०६/२००९ ला पंढरपुरात पोहोचले.संस्थानच्या भक्त निवास मध्ये मुक्काम असे.सोमवारी सकाळी साधकांचे मायबाप सद्गुरु मारोती बाबा कुऱ्हेकर महाराजांना भेटायला आले.मारोती बाबांसोबत अध्यात्मविषयक चर्चा झाली.
मारोती बाबांना म्हटले"आता मला सुखाने जावेसे वाटते".
मारोती बाबा म्हटले "महाराज तुमचा आधार आम्हास हवा आहे."
महाराज मारोती बाबांना म्हटले "मला माउली कृपेने अजूनही आत्मज्ञान आहे" असे म्हणून परमोच्च ज्ञानाच्या दोन चार ओव्या सांगितल्या
"तरी आता देह असो अथवा जावो | आम्ही तो केवळ वस्तूची आहो | का जे दोरी सर्पत्व वावो | दोराचीकडूनि ||"
"मज तरंगपण असे कि नसे | हे उद्कांसी काही प्रतिभासे | ते भलतेव्हां जैसे तैसे | उदकची कि ||",
"तरंगाकारे न जन्मेचि | ना तरंगलोपे न निमेचि | तेवी देही जे देहेचि | वस्तू झाले ||",
"मग भलतेथ भलतेव्हां | देह्बंधू असो अथवा जावा | परी अबंधा नित्य ब्रम्ह्भावा | बिघाड नाही ||".
असे दिव्य आत्मज्ञान ऐकून मारोती बाबा उपस्थितांना म्हणाले
"ते ऋणवैपण देखोनि आंगी | आपुलियाचि उत्तीर्णत्वालागी | भक्ताचिया तनुत्यागी | परिचर्या करी ||",
"देह वैकल्याचा वारा | झणे लागेल या सुकुमारा | म्हणौनी आत्मबोधाचा पांजिरा | सुये तयाते ||"
अश्या ओव्या त्यांनी म्हटल्या.मारोती बाबांनी सांगितले कि "वासुदेव महाराजांचा सांभाळ प्रत्यक्ष माऊली करीत आहेत.अशा परमज्ञानी साक्षात ईश्वरच असलेल्या महाराजांची सेवा करणारे सर्व भक्त मंडळी धन्य धन्य आहेत.महाराज पूर्ण बोधावर असून सर्व काही महाराजांच्या इच्छेप्रमाणे सुरु आहे.महाराज विदेही अवस्थेत आहेत."मंगळवार दिनांक ३०/०६/२००९ ला संस्थानच्या पंढरपूर शाखेत महाराजांचे दुपारी चार वाजता प्रवचन झाले.त्याच रात्री "हीच व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||"या अभंगावर कीर्तन झाले.गुरुवार दिनांक २/७/२००९ ला माऊली पंढरपुरात येण्याची आर्त वाट पाहू लागले.माऊली पंढरपुरात आली आणि संस्थानमध्ये सुरु असलेला कीर्तनातील "ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम "हा गजर ऐकताच माऊली माऊली म्हणून रात्री ९.४५ वाजता गुरुवर्यांनी कायमचे डोळे मिटले.एक तेजस्वी,भक्तीचा,ज्ञानाचा दीप विझला.चालता बोलता चिंतामणी पंढरपूरच्या वाळवंटात हरवला.दिनांक ३/७/२००९ ला आषाढी एकादशीच्या दिवशी संस्थानच्या शिस्त बद्ध वाटचालीत भव्य दिव्य वैकुंठरथावर गुरुवर्य महाराज आरूढ होवून दिंड्या पताकांच्या भारात असंख्य भक्तांच्या शोकात अखंड चंद्रभागे मातेच्या वाळवंटात अग्निरुपात स्थिरावले.श्री सारंगधर महाराज मेहूनकर,श्री बंडातात्या कराडकर, श्री तुकाराम महाराज सखारामपुरकर, श्री प्रकाश महाराज जवंजाळ, श्री नरहरी महाराज चौधरी, श्री भास्करगिरी महाराज देवगड, श्री संदीपन महाराज हसेगावकर, श्री रामेश्वर महाराज तिजारे, श्री रंगराव महाराज टापरे, श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ, श्री रामेश्वर महाराज शास्त्री इत्यादींची श्रद्धांजलीपर भाषणे होवून सगळ्यांनी महाराजांना अखेरचा निरोप दिला. गुरुवर्य महाराजांवर ज्यांच नितांत प्रेम आणि श्रद्धा होती अशे धुळे जिल्ह्यातील महान संत गुरुवर्य तुळशीराम बाबा होळकर त्यांच्या अहिराणी भाषेत म्हटले."माझा वासुदेव बाबा अजून गेला नाही,त्याने कपडा टाकला,तो गंज(पुन्हा पुन्हा) भेट देईल."
वासुदेव माउली लीन झाली कैसी | अखंड विसावली चंद्र्भागेसी ||
वासुदेवा चित्त तुझे चरणासी | नाठवे मानसी दुजे काही ||
पालखीत देह दिसे दिव्य तेज | कारे मायबापा झालासी तू शांत ||
तुझी वाट किती पाहू रे मी आता | एकवेळ भेटी अनाथांच्या नाथा ||
देवादिक ही झाले निशब्द आता | ओवाळोनी सांडेन जीव हा माझा ||
अश्या या महान संतांच्या चरणी साष्टांग दंडवत.
यंदाचा पुण्योत्सव हा दिनांक 14 जुलै रोजी श्रीसंत वासुदेव महाराज धर्मशाळा,म्हसोबा मंदिरजवळ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रात्री 9.45 वाजता महाआरतीने संपन्न होणार आहे...
(वरील सर्व माहिती हि गुरुवर्य महाराजांचे नातू श्री ज्ञानेशप्रसाद पाटील सावरकर,अकोट यांच्या पत्नी सौ इंद्रायणी पाटील सावरकर यांनी लिहिलेल्या अप्रतिम अश्या श्रीसंत वासुदेव दर्शन या गुरुवर्य महाराजांच्या जीवनावरील ग्रंथातून दिलेली आहे.)

संकलक - श्रीकांत महाराज खवले

शुक्रवार, ८ जुलै, २०१६

साठवणीतील वारी भाग- ३

*** लागला टकळा पंढरीचा ***

#साठवणीतलीवारी-३

वारी म्हणजे काय? परमाराध्य भगवान माउलींच्या शब्दांत सांगायचे तर " सुखाची मांदुस " आहे वारी ! अपरंपार आनंदाचे गावच्या गाव मजल दरमजल करीत भूवैकुंठ पंढरीला निघालेेले आहे. त्या आनंदाच्या कल्लोळातला खरा ब्रह्मानंद आहेत भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज;  चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा, कोवळिकेचा मळा, प्रेमाचा कळवळा माझा ज्ञानोबा  !!!
जगात सर्वजण आनंदाकडे, आनंदासाठी सतत धावत असतात. तो सापडतोच असे नाही. सापडला तर पूर्णपणे भोगताही येत नाही. कधी हातून निसटून जातो, कळत देखील नाही. पण आमचा हा दैवी ब्रह्मानंद? अहो, हा स्वत:च सर्व सवंगड्यांना घेऊन आपल्या दारी येतो, आपल्या पाठी लागतो, मला पाहा, मला अनुभवा, माझा भोग घ्या, माझा आस्वाद घ्या....असे म्हणत. हा माउलीरूप कैवल्यचंद्राचा अम्लान चांदणबहार पुरे म्हणून उरत नाही आणि हवा म्हणून सरत नाही. याच वैकुंठीच्या अमृत-परगुण्याला आमच्या सद्गुरु माउलींचा पालखी सोहळा म्हणतात. येथे येऊन जो प्रेमाने पानावर बसेल तो देवदुर्लभ तृप्ती अनुभवूनच समाधानाच्या हाती आचवतो.
आज हे कैवल्यसाम्राज्य आमच्या फलटणमधे विसावलेले आहे. " ऐसा सुखसोहळा स्वर्गीं नाही " म्हणत आम्ही माउलीच्या स्वागतासाठी, खरेतर अपार विरहाने कातर होऊन माय-भेटीसाठी आसुसलेलो आहोत. कधी एकदा ती त्रिभुवनपावन मायमाउली दृष्टीस पडते आणि सर्वस्वाचे बंधन सोडून तिच्या प्रेमअंकी बसतोय, अशीच स्थिती होऊन गेली आहे. माझ्या लाडक्या माउलीलाही मला भेटण्याची अशीच उत्सुकता असेल का? हा प्रश्न अनाठायी असला तरी क्षणभर येतोच मनात. ती नुसती माय नाही, माउली पण आहे ना ! ती आपल्या कोणत्याही बाळाला कधीतरी विसरेल का? त्यात एखादे पोर अपंग असेल तर तिचा कळवळा अधिक पान्हावतो त्याच्यासाठी. शिवाय " तुका म्हणे जे येथे । तेथे तैसेचि असेल ॥" हा तर तिचा स्थायीभावच. हा विचार येऊन मन शांत होते व पुन्हा तिच्या प्रेमात आणि त्या निरपेक्ष प्रेमाच्या मनावर गोंदलेल्या हळव्या आठवणीत मग्न होऊन जाते. या अशाश्वत जगातला हाच खरा शाश्वत सुखाचा विसावा नाही का?
मी पहिल्यांदा वारीला गेलो १९९६ साली, दहावी झाल्यावर. पण त्याआधी माउलींचा फलटणचा मुक्काम एवढाच त्यांच्याशी, वारीशी माझा संपर्क होत असे. त्यामुळे माउली येणार म्हटले की तो दिवस शेकडो दिवाळी दस-यांसारखा वाटायचा. श्रीमंत बाळमहाराजांबरोबर दोनदा प्रस्थानाला तेवढा मी गेलो होतो. पण वारी सुरू झाल्यापासून दररोज न चुकता सकाळ मधील वारीची प्रत्येक बातमी मी अधाशासारखी वाचत असे. त्यावेळी आजच्या सारखा टीव्ही चॅनेल्सना वारीचा छंद लागलेला नव्हता, पण पेपरमध्ये मात्र माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे सविस्तर वृत्त येत असे. त्यावरच माझी तहान भागायची.
भगवान श्रीमाउलींची पालखी आषाढ शुद्ध तृतीयेला फलटण मुक्कामी असते. काहीवेळा तिथीच्या वृद्धीमुळे दोन मुक्काम पडत असत. मग काय जास्तच मज्जा. तृतीयेला सकाळी केंदूरच्या श्रीसंत कान्हूराज पाठक महाराजांची पालखी आमच्या माउलींच्या मंदिरात येई. त्यांचे थोडावेळ भजन होई व मग ते पुढे निघून जात. त्यांचा सुंदर नक्षीकाम केलेला लाकडी रथ पहायला मला खूप आवडायचा. मी त्यांची दिंडी मंदिरात आली की धावत जाऊन दर्शन घेऊन यायचो. हे श्रीसंत कान्हूराज महाराज माउलींच्या काळातील, नागेश संप्रदायातील फार थोर विभूतिमत्व होते. माउली त्यांना प्रेमादराने ' काका ' म्हणत असत म्हणजे पाहा. त्यांच्या हकीकती खूप जबरदस्त आहेत, पण त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन.
मी देवांच्या कृपेने कोणा पोरीच्या प्रेमात कधी पडलो नाही. पण असल्या मर्यादित लौकिक प्रेमाला कधीच समजू शकणार नाही अशा, प्रेमाच्या अत्युच्च स्तरावरील या माउलीप्रेमाचा अगदी किंचित, कणभर स्पर्श सद्गुरुकृपेने लाभलाय. तेवढाच मला स्वर्गसुखाची अनुभूती सतत देतो आहे. माउलींनी आपल्या या प्रेमकृपेच्या मधाचे बोट लावून आजवर किती जीवांना वेडावून सोडलंय, कायमचे अंकित करून ठेवलंय, हे तेच एक जाणतात ! पण ही संख्या गणिताच्या आवाक्यातली नाही, हे मात्र नक्की. हे माउलींचे वेडेपण फार फार अद्भुत आणि हवेहवेसे वाटणारे आहे.
आज कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट आमच्या फलटणी पहुडलाय. राजा चाले तेथे वैभव सांगाते । असे म्हणतात. ते खरेही आहे. भगवान माउलींबरोबर त्यांचा सारा वैष्णवमेळाही आहे. विठुरायाच्या प्रेमाने भारलेल्या, निरंतर आनंदाने बहरलेल्या माझ्या या सर्व हरिमय बांधवांना सादर वंदन. आणि आम्हां सर्वांचेच परमाराध्य असणा-या महाभागवतोत्तम भगवान सद्गुरु श्रीज्ञानराज माउली महाराजांच्या नित्यश्रीर्नित्यमंगल श्रीचरणारविंदी अनंतानंतकोटी दंडवत प्रणाम  !!!!!
देवा, माझ्या तोडक्या मोडक्या, प्रेम-मायेची धड गादी उशीही नसणा-या आणि जर्जर झालेल्या हृदयमंचकावर शांत झोप येईल ना हो आपल्याला? आपल्याच कृपेने जशी जमली तशी सेवा केली आहे, गोड मानून घ्यावी, हीच कळकळीची प्रार्थना  !
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी करा हा गजर ॥१॥
करे टाळी मुखी नाम ।
तया कैचा भवभ्रम ॥२॥
दोष नासती अपार ।
पापे पळती सत्वर ॥३॥
शिर चरणांवरी गाढे ।
आत सुख दुणे वाढे ॥४॥
गुरु माउली भगवंत ।
त्रयमूर्ती एक तत्त्व ॥५॥
नेत्री वाहे अश्रुुपूर ।
आत्मजा आनंदविभोर ॥६॥
- ७ जुलै २०१६ ( क्रमश:)
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in